वळवाच्या संततधार पावसाने बळीराजा सुखावला   

पेरणीपूर्व मशागतीच्या तयारीला सुरूवात

नीरा, (वार्ताहर) : गेली दोन महिने उकड्यांना हैराण झालेल्या त्याचबरोबर पाणीटंचामुळे त्रस्त असलेल्या लोकांना मागील दोन दिवसापासून संततधार पडत असलेल्या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला. कोणत्याही वादळ वार्‍या शिवाय संततधारपणे बरसणारा हा पाऊस शेतकर्‍याला सुखवणारा तर आहेच, त्याचबरोबर हवेतील उखाडा घालवणारा देखील ठरला आहे. उखाड्याने हैराण झालेल्या लोकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
 
पुरंदर तालुक्यातील दक्षिण पूर्व भागातील नीरा आणि परिसरामध्ये मागील पाच दिवसापासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. सुरुवातीला वादळी वार्‍यासह हा पाऊस आला. त्यामुळे काही प्रमाणात नुकसानही झाले. विशेषतः वीजेचे खांब अनेक ठिकाणी पडले होते. त्यामुळे वीजपुरवठा काही खंडित झाल्याचे देखील पाहायला मिळाले. यानंतर बुधवारी सायंकाळी चार नंतर बरसलेल्या धो धो पावसामुळे ओढे नाले तुडुंब भरले आहेत. मान्सून पूर्व झालेल्या या पावसाने शेतकरी समाधानी झाला आहे. 
 
पुरंदच्या दक्षिण पूर्व भागात उन्हाळ्यातील पाणी टंचाईमुळे टँकरची वाट पाहणार्‍या नागरिकांच्या चेहर्‍यावर समाधान पाहायला मिळत आहे. कारण, या पावसामुळे विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान, मंगळवारी व बुधवारी सायंकाळी नीरा शहर परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. राख, कर्नलवाडी, गुळूंचे, कर्नलवाडी, पिंपरे (खुर्द), थोपटेवाडी या वाल्हे मंडळामध्ये जोरदार पाऊस झाला असून शेतात पाणी साचून ओढे नाल्यात पाणी आले आहे.    
 
तालुक्यामध्ये मागील पाच दिवसांमध्ये १२३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शेतकर्‍यांनी पेरणीपूर्व मशागती करण्याला काही हरकत नाही. त्यांनी पूर्व मशागती करून घ्याव्यात. मात्र, खरिपाच्या पेरणीची घाई आत्ताच करू नये. कारण, अजून मान्सून केरळमध्ये आलेला नाही. हवामानासंदर्भात अजूनही अंदाज देता येत नाही. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला तर पाऊस लांबू शकतो. लवकर पेरणी केली आणि पाऊस लांबला तर पिकांचे नुकसान होऊ शकते किंवा दुबार पेरणीचे संकट येऊ शकत. त्यामुळे शेतकर्‍यांनी पेरणीसाठी थोडी वाट पाहावी.
 
- सुरज जाधव, तालुका कृषी अधिकारी. 
 
आता पडलेला पाऊस खरिपाच्या पिकासाठी अत्यंत चांगला आहे. मात्र, या पावसामुळे फळबागांचा नुकसान झाले आहे. छाटलेल्या सीताफळ, डाळिंब बागा त्याचबरोबर अंजीर बागांचे यामुळे नुकसान होणार आहे. जर हा पाऊस आणखी चार दिवस लांबला तर टोमॅटो पिकाचे देखील नुकसान होऊ शकते. मात्र, खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हा पाऊस उपयुक्त आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी खरिपाच्या  पेरणीपूर्व मशागत करायला हवी. मात्र, पेरणीसाठी पावसाची आणखी वाट पहावी लागणार आहे. 
 
- सुधीर निगडे, प्रगतिशील शेतकरी, कर्नलवाडी.

Related Articles